एक गरूड व एक घुबड यांचं बरेच दिवस चालत असलेलं वैर एकदाशी संपुष्टात आलं. दोघांनीही एकमेकांशी प्रेमानं वागण्याचं त्याचप्रमाणे एकमेकांच्या पिल्लांना न खाण्याचं वचन दिलं.आता ते एकमेकांचा निरोप घेणार इतक्यात गरूड घुबडाला म्हणाला,''घुबडराव, तुम्ही मला एक गोष्ट सांगा की, मी तुमची पिल्लं कशी असतात ते अजून पाहिलेलं नाही तेव्हा तुम्ही त्यांचं वर्णन करा. म्हणजे त्यांना ओळखणं व न खाणं माझ्या दृष्टीनं सोयीचं जाईल.'' घुबड म्हणाले,''गरूडराव, आपणच आपल्या तोंडाने आपली स्तुती करणे हा केवळ मूर्खपणा आहे पण तरीसुद्धा सांगतो माझी पिल्लं अगदी गोजिरी आहेत. अवर्णनीय सौंदर्य म्हणजे काय ते माझ्या पिल्लांकडे पाहून कळते. काय ते त्यांचे गोलसर चेहरे, काय ते सुंदर डोळे अगदी देवानं सारं रूपभांडार माझ्या पिल्लांमध्येच ओतलंय.'' एवढे बोलल्यावर गरूड व घुबड दोघेही उडून गेले. चार दिवसानंतर भूकेला गरूड भक्ष्याच्या शोधार्थ इकडेतिकडे संचार करत असताना एका झाडाच्या ढोलीत त्याला कुठल्यातरी पक्ष्याची अत्यंत कुरुप अशी तीन चार पिल्लं दिसली. गरुडाने विचार केला की घुबडाने ज्या अर्थी त्याची पिल्लं अत्यंत सुंदर असल्याचे सांगितले आहे त्याअर्थी ही पिल्ले त्याची असणेच शक्य नाही असे वाटून त्याने ती पिल्ले खाऊन टाकली. तेवढ्यात तिथे घुबड आले व आपली पिल्ले खाल्लेली पाहून घुबड खूप संतापले व गरूडाला म्हणाले,'' नीच पक्ष्या तू ही शेवटी वचनभंग केलास. दिलेल्या वचनाला न जागणे म्हणजे काय हे तू दाखवून दिलेस. माझी पिल्ले खाऊन तू मोठा गुन्हा केला आहेस'' यावर गरूड म्हणाला,'' घुबडराव रागावू नका पण मी खूप भूकेला होतो आणि या झाडाच्या ढोलीत असणारी पिल्ले अतिशय कुरुप होती. ती तुमची असणे शक्यच नाही असे वाटून मी ती खाल्ली. तुम्ही तुमच्या पिल्लांचे रूपवर्णन अतिशय मोहक व सुंदर असल्याचे केले होते. तुम्हीच तुमचा नाश स्वत:च्या बोलण्याने करून घेतला आहे.'' यावर घुबडाला काहीच बोलता आले नाही व ते तिथून निघून गेले.
तात्पर्य - कधीकधी आपण आपला नसता मोठेपणा इतरांसमोर मांडत असतो पण प्रत्यक्षात तसे नसते. खरी परिस्थिती कधी ना कधी उघडकीस येते याचे भान
ठेवून सत्य सांगितल्यास भविष्यातील धोके टाळता येतात.
No comments:
Post a Comment