एका गावात एक पिठाची गिरणी होती. गिरणीचा मालक थोडासा लुच्चा इसम होता. तो गि-हाईकाच्या दळणातील थोडेसे धान्य अथवा पीठ काढून घेत असे. त्याची ही चोरी अनेकांच्या लक्षात येत असे पण गावात दुसरी गिरणी नसल्याने लोक गप्प बसत असत. एकेदिवशी धान्याच्या टोपलीत गिरणीमालकाला एक उंदीर सापडला. त्या उंदराला पकडून तो माणूस त्याच्या मांजराकडे देणार इतक्यात तो उंदीर विनवणीच्या सुरात त्या दळणक-याला म्हणाला,'' अहो मालक, मी चोर नाही. तुमच्याकडे येणा-या धान्यातील चारदोन दाणे खाऊन मी माझी भूक भागवितो आहे. तेव्हा मला कृपया तुम्ही सोडून द्यावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे.'' त्याचे हे बोलणे ऐकून तो इसम त्याला म्हणाला,''अरे उंदरा धान्याचे चारदोन दाणे का होईना पण ते तू चोरून खातोसच ना. मग ही चोरीच आहे त्याबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे.'' उंदीर म्हणाला,'' प्रत्येक दळणातले चारदोन दाणे खाणारा मी जरी चोर असलो तरी मी खूपच छोटी चोरी करतो तुम्ही तर प्रत्येक दळण दळण्याचे पैसेही घेता आणि वरून त्या दळणातील थोडे धान्य आणि थोडे पीठ अशी तिहेरी चोरी करता मग तुम्ही तर खूप मोठे चोर आहात. अशा या चोरीबद्दल तुम्ही स्वत:ला काय शिक्षा करून घेणार आहात.'' उंदराच्या या बोलण्याने माणूस खूपच संतापला व म्हणाला,'' चोरी करून ते करून वरून परत मलाच चोर ठरवतोस. काहीही झाले तरी माणूस आहे आणि माणूस हा पृथ्वीवरचा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. तो काय करतो, कुठे चुकतो, कुठे बरोबर असतो हे ठरवण्याचा अधिकार प्रत्यक्ष परमेश्वरालाही नाही. तू लहान का होईना चोरी केलीस आणि आता तू शिक्षेला पात्र आहेस'' असे म्हणून त्याने त्या उंदराला मांजराच्या स्वाधीन केले.
तात्पर्य - जगात लहान चोरांना शिक्षा मिळते आणि मोठ्या चोरांना प्रतिष्ठा मिळते. वर्तमानपत्रातून संग्रहित
No comments:
Post a Comment