लष्करातला एक घोडा रस्त्याने चालला होता. त्याच रस्त्याने पाठीवरून ओझे घेऊन जाणा-या एका गाढवाला घोड्याने पाहिले व म्हणाला,''अरे मूर्ख प्राण्या, पटकन बाजूला हो नाहीतर माझ्या पायाखाली फुकट तुडविला जाशील.'' त्याचे ते उर्मटपणाचे बोलणे ऐकून ते गाढव निमूटपणे बाजूला झालं पण त्या घोड्याचा उमदेपणा व त्याचा रूबाब, ऐट पाहून ते गाढव मनातल्या मनात म्हणालं,''देवा, हा जन्म मला ओझे वाहणा-या गाढवाचा दिला आहेस पण पुढचा जन्म मात्र मला अशा लष्करी, उमद्या जातीच्या घोड्याच्याच पोटी घाल मात्र याचा उर्मटपणा मला देऊ नकोस.''थोड्याच दिवसांनी एका लढाईत तो घोडा जखमी झाला व लढाईच्या दृष्टीने निकामी झाला तेव्हा त्याच्या सरदार मालकाने त्याला एका कुंभाराला विकले. त्या घोड्याच्या दुर्दैवाने त्याचा मालक व त्या गाढवाचा मालक एकच होता. दोघांनाही आता कुंभाराचे साहित्य घेऊन बाजारात जाणे भाग असे. त्या उमद्या पण जखमी घोड्याला आपल्यासारखेच ओझे वाहताना, हमाली करताना पाहून आता गाढवाने पुन्हा प्रार्थना केली,'' हे देवा, या लष्करी घोड्याचा शेवटचा काळ किती कठीण आहे रे,प्रथम वैभव भोगून हा आता अत्यंत कठीण दिवस काढत आहे,याच्या चलतीच्या काळात हा उन्मत्तपणे वागल्यामुळे याच्या या परिस्थितीबद्दल कोणालाही याच्याबद्दल सहानुभूतीही राहिली नाही.देवा, असा उद्दाम व उर्मट घोडा बनण्यापेक्षा मी आहे तो गाढवच बरा आहे.''
तात्पर्य :- तुम्ही रसिक वाचक कथेतील मर्म जाणून घ्याल अशी अपेक्षा आहे.
No comments:
Post a Comment